

उन्हाचा पारा थेट ४० च्या वर गेलाय. या वाढत्या उष्णतेमुळे सर्वसामान्यांच्या अंगाची लाहीलाही होतेय. उन्हाळा आता नको-नकोसा झालाय. पण कधी त्या गोठ्यात बांधलेल्या मुक्या जनावरांचा विचार केलाय का? त्यांना बिचाऱ्यांना तर सांगताही येत नाही की, बाबांनो, जरा फॅन चालू करा किंवा फ्रीजमधलं थंड पाणी द्या! आपल्याबरोबरच पशु-पक्षांनाही उष्णेतेच्या लाटेचा फटका बसला आहे.
कडक उन्हामुळे गाई-म्हशींचे दूध कमी होते, त्यांना उष्माघात (Heat Stroke) होतो आणि आपली जनावरं आजारी पडतात, काही तर दगावतात सुद्धा. यावर उपाय म्हणून मग डॉक्टर आणि महागडी औषधं आलीच. पण थांबा! खिशातले पैसे घालवण्यापूर्वी आपल्या स्वयंपाकघरात डोकावून बघा. तिथं उन्हाळ्यावर मात करण्यासाठी आणि उष्माघातापासून जनावरांना वाचवण्यासाठी रामबाण उपाय दडलाय.
उन्हाळ्यात माणसाला जशी चक्कर येते, तसेच जनावरांच्या शरीरातील पाणी कमी होऊन ती गळपटून जातात. यावर पहिला रामबाण उपाय आहे पिण्याच्या पाण्यात थोडा गुळ, चिमूटभर काळं मीठ आणि लिंबाचा रस मिक्स करा आणि जनावरांना पाजा. हे पाणी म्हणजे जनावरांसाठी ‘इन्स्टंट एनर्जी ड्रिंक’ आहे. याने शरीरातील पाण्याची पातळी एकदम ओक्के राहते. तुम्हाला तर माहिते..कोरफड आपल्या त्वचेसाठी भारी असते पण ती जनावरांसाठीही अमृत आहे. कोरफडीचा ताजा गर काढा आणि तो ताकात मिक्स करून जनावरांना द्या. यामुळे जनावरांच्या शरीरातील उष्णता कमी होईल आणि त्यांची पचनक्रियाही सुधारेल. तसेच, उन्हाळ्यात जनावरांची भूक मंदावते, अशा वेळी त्यांना वडीशेप आणि खडीसाखर एकत्र करून खाऊ घातल्याने त्यांचे पोट थंड राहते आणि दुधाचे प्रमाणही टिकून राहते.
पण याउलट उन्हाळ्यात कोणत्या चुका करू नये हे माहिती असायलाच पाहिजे. दुपारी कडक उन्हात जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नका. त्यांना झाडाच्या किंवा गोठ्याच्या थंड सावलीतच बांधा. गोठ्यामध्ये हवा खेळती राहील अशी व्यवस्था करा. जमल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा जनावरांना थंड पाण्याने अंघोळ घाला. उन्हाळ्यात कोरड्या चाऱ्याला जरा सुट्टी द्या आणि हिरवा चारा जास्त वापरा. कारण हिरव्या चाऱ्यात पाण्याचे प्रमाण भरपूर असते, जे जनावरांना हायड्रेटेड ठेवतं.
आपल्या पशुधनाला उन्हाच्या त्रासापासून वाचवण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य जपण्यासाठी हे निसर्गोपचार अत्यंत फायदेशीर आणि बजेट-फ्रेंडली ठरतात.




