लेखउभारी देणारं असं काहीप्रेरणादायी

Divya Deshmukh : दिव्यानं कसा जिंकला बुद्धिबळाचा वर्ल्ड कप?

Divya Deshmukh :असं म्हणतात, की चपळ बुद्धिमत्ता, कष्टाची तयारी आणि सातत्य असलं, तर कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे कु. दिव्या देशमुख .फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणारी भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर.

वयाच्या सहाव्या वर्षीच तिच्या हातात बुद्धिबळाची पट होती, ज्या वयात इतर मुलं खेळण्यांत गुंग असतात, त्या वयात तिने डाव-प्याद्यांची शाळा सुरू केली. बुद्धिबळासारखा गुंतागुंतीचा खेळ सोबत ठेवत ती सातत्याने पुढे जात राहिली. या वाटचालीत तिला अनेक अडथळे आले, पण ती कधीही थांबली नाही, डगमगली नाही. तिच्या हाच संघर्षमय पण प्रेरणादायी प्रवास आपण आजच्या लेखात जाणून घेऊया. 

प्रारंभिक आयुष्य 

दिव्या देशमुख हिचा जन्म ९ डिसेंबर २००५ रोजी नागपूर येथे झाला. तिचे आई-वडील दोघेही वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे घरात अभ्यासाचे चांगले वातावरण होते. दिव्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिच्या मोठ्या बहिणीला बॅडमिंटनची आवड होती, त्यामुळे दिव्यालाही सुरुवातीला त्या खेळात रस वाटू लागला. मात्र तिच्या पालकांना वाटत होते की, दिव्याने बुद्धिबळ खेळावे.

त्यामुळे त्यांनी तिला लहान वयातच नागपूरमधील एका नामांकित बुद्धिबळ अकॅडमीत प्रवेश करवून दिला.  तिथूनच तिच्या बुद्धिबळ प्रवासाला सुरुवात झाली. लहान वयातच बुद्धिबळातील तिची चमक दिसू लागली आणि हळूहळू ती या खेळात पारंगत होत गेली.

बुद्धिबळाकडे यशस्वी वाटचाल 

२०१२ मध्ये पॉंडिचेरी येथे अंडर – ७ पहिले राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवत दिव्याच्या प्रवासाची सुवर्ण सुरुवात झाली. पुढच्याच वर्षी इराणमध्ये आशियाई अंडर – ८ गटात स्पर्धेत विजेतेपद मिळवून तिने खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची ओळख निर्माण केली. पुढे ती सर्वात कमी वयाची वुमन फिडे मास्टर ठरली. २०१४ मध्ये डर्बन येथे अंडर – १० वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकताना ती भारतीय बुद्धिबळाच्या आशा – आकांक्षांचे प्रतीक बनली. आजवरच्या कारकिर्दीत तिने भारताचे तब्बल ४० वेळा प्रतिनिधित्व करत २३ सुवर्ण, ७ रौप्य व ५ कांस्य अशी ३५ पदकांची श्रीमंती मिळवली. २०२० मध्ये फिडेच्या ऑनलाईन ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या विजयी संघात सहभागी होऊन देशाची ताकद दाखवली. २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर पदवी प्राप्त करून आपले पाय आणखी मजबुत केले आणि अखेर २०२५ मध्ये वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी भारताची ८८ वी ग्रँडमास्टर म्हणून इतिहास रचला.

कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली आणि वैशाली रमेशबाबू यांच्या पावलांवर पाऊल  ठेवत भारताची ग्रँडमास्टर म्हणून तिचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले. तिच्या या ऐतिहासिक विजयाने ती केवळ भारतीय नव्हे तर जागतिक बुद्धिबळातील एक उज्ज्वल भविष्य असल्याचे सिद्ध झाले. 

ते म्हणतात ना, “मंजिले उन्हीं को मिलती हैं ,जिनके सपनों में जान होती हैं , पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती हैं।”  या उत्कीला दिव्याच्या या यशोगाथेने सिद्ध केले. दिव्याचा विजय केवळ एक स्पर्धा जिंकण्यापुरते मर्यादित नसून आपल्या पिढीला प्रेरणा देणारा आहे.तिचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की , प्रचंड इच्छाशक्ती , कार्याप्रती समर्पण आणि चिकाटीच्या बळावर प्रत्येक गोष्ट साध्य करता येते. 

क्षेत्र कोणतंही असो, भारतीय महिला रणांगण गाजवतेच !      

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button