पांढऱ्या कोटातून मातीच्या सेवेपर्यंत: ७५,००० ची नोकरी सोडून काव्या ढोबळेने उभा केला ‘लाखोंचा’ कृषी ब्रँड! कोण आहे काव्या ढोबळे? जाणून घ्या.


अनेकांच्या मनात चांगल्या सरकारी किंवा स्थिर नोकरीबद्दल आकर्षण असते. “जिथे चांगल्या पगाराची आणि सुरक्षित भविष्यातील हमी आहे, ती नोकरी सोडून दुसऱ्या अनिश्चित क्षेत्रात का जावं?” असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, जुन्नर येथील काव्या ढोबळेने हा विचार बाजूला ठेवत, महिन्याला ७५,००० रुपये पगाराची चांगली नोकरी सोडून कृषीपूरक व्यवसायाचा मार्ग स्वीकारला. आज ती केवळ यशस्वीच नाही, तर दर महिन्याला लाखो रुपये कमवत आहे, आणि तिची कहाणी अनेकांसाठी आदर्श ठरली आहे.
काव्याच्या यशात एक महत्त्वाचा संदेश आहे. तो म्हणजे जर स्वतःवर विश्वास ठेवला आणि कठोर मेहनत केली, तर कोणतीही अडचण पार करता येते. मात्र, स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधी कधी, “आपलं स्वप्न पूर्ण होईल का?” या शंकेतूनही काही जण जातात. पण हेही सत्य आहे की, अनेक व्यक्ती अपयशांवर मात करून उशिरा का होईना, यश मिळवतात. काव्यानेही हे सिद्ध करून दाखवलं आहे.
या लेखात आपण काव्याच्या जीवनातील संघर्ष, तिचं यश आणि त्यामागील मेहनतीचा प्रवास याविषयी जाणून घेणार आहोत.
शेतीची आवड आणि प्रेरणा
काव्याला लहानपणापासून शेतीची आवड होती. मात्र, त्या वेळी शेतीत करिअर करण्याची शक्यता धूसर वाटत होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. तिने जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीमध्ये पदविका पूर्ण केली आणि मुंबईतील सायन हॉस्पिटल येथे काम करण्यास सुरुवात केली.
सायन हॉस्पिटलमध्ये काम करत असताना तिला जाणवलं की रासायनिक शेती व त्यातून मिळणारे खाद्यपदार्थ मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. तिच्या या जाणिवेला कोरोनाच्या महामारीने अधिक धार दिली. कोरोना काळात रुग्णांची सेवा करताना आणि स्वतः कोरोना पॉझिटिव्ह होऊन गंभीर आरोग्य संकटातून जात असताना तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. महामारीमुळे झालेली हानी आणि मृत्यू पाहून तिला प्रकर्षाने जाणवलं की, मानवाच्या आरोग्यासाठी शुद्ध खाद्य हाच योग्य मार्ग आहे.आणि त्यासाठी सेंद्रिय शेती महत्वाची आहे.
तिने ठरवलं की नोकरी सोडून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळायचं. शेतीत उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिने सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला.
कृषी क्षेत्रातील नवा प्रयोग आणि व्यवसायाला सुरुवात
२०२२ हे वर्ष काव्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा ठरलं. तिने नोकरी सोडून शेती क्षेत्रात काम करण्याचा धाडसी निर्णय घेतला, जो अनेकांसाठी अचंबित करणारा होता. मात्र, तिचा निर्धार पक्का होता आणि पतीची साथ मजबूत होती.दोघांनी त्यांच्या पुण्यातील जुन्नर येथे असलेल्या पाच गुंठे शेतीतून गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याचं ठरवलं. शेतकऱ्यांशी संवाद साधत रासायनिक खतांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर त्यांनी जागरूकता निर्माण केली आणि स्वतः गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग सुरू केला.
ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी एका शेतकऱ्याकडून एक किलो गांडुळे खरेदी करून छोट्या खोलीत खत निर्मितीला सुरुवात केली. ऑक्टोबरमध्ये तयार झालेलं पहिलं खत पाहून काव्याचा आत्मविश्वास वाढला. मार्च २०२३ मध्ये त्यांनी “कृषी काव्या” या ब्रँडच्या अंतर्गत व्यावसायिक विक्री सुरू केली. त्यांच्या उच्च गुणवत्तेमुळे मोठ्या प्रमाणात खताला मागणी वाढली. एका शेतकऱ्याने ५० हजार रुपयांचं खत खरेदी केलं, तर एका संस्थेनं २००० किलो गांडुळे खरेदी केली, ज्यामुळे तिला मोठं आर्थिक यशही मिळालं.


या यशाच्या जोरावर काव्या ने जैविक शेती आणि गांडूळ खत निर्मितीचा प्रसार अधिक व्यापक करण्यासाठी एक यूट्यूब चॅनल सुरू केलं. त्यात तिने शेतकऱ्यांना प्रगत शेती पद्धतींची माहिती देणारे व्हिडिओ तयार केले आणि इतर शेतकऱ्यांचे यशोगाथाही शेअर केल्या.अल्पावधीत तिच्या “कृषी काव्या” ब्रँडने जैविक शेतीसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं.
वर्षाला 24 लाख रुपये कमाई
काव्या चा गांडूळ खत तयार करण्याचा व्यवसाय २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रचंड यशस्वी ठरला. तिने या वर्षात जवळपास २४ लाख रुपयांची उलाढाल केली आहे आणि पुढील वर्षासाठी ५० लाख रुपयांचे ध्येय ठरवले आहे. तिच्या यशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांना खत निर्मितीचे प्रशिक्षण देणे. काव्याने शेतकऱ्यांना गांडूळ खत तयार करण्याची तंत्रे शिकवण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन केले, ज्यामुळे २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या प्रक्रियेची माहिती मिळाली.
त्याचबरोबर, काव्या रासायनिक मुक्त शेतीच्या तत्त्वज्ञानावर जनजागृती करत आहे. तिच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना जैविक शेतीची महत्त्वाची माहिती मिळत आहे आणि ते आपल्या पारंपरिक पद्धतींमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. काव्याचे हे काम शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणारे ठरले आहे, कारण ती त्यांना अधिक शाश्वत आणि आरोग्यदायी शेती करण्यासाठी प्रेरित करत आहे.
मित्रांनो, काव्या ची कहाणी खरोखरच अत्यंत प्रेरणादायक आहे.सरकारी नोकरी सोडून कृषी क्षेत्रात पाऊल ठेवणे आणि यशस्वी होऊन दाखवणे हि साधी गोष्ट मुळीच नाही त्यासाठी प्रचंड जिद्द आणि इछशक्ती लागते .तिचा हा प्रवास संघर्ष आणि समर्पणाचा आहे. तिने आपला ठाम निर्णय घेतला आणि अनेक अडचणींवर मात करत शेती व्यवसायात मोठे यश मिळवले. तिच्या या यशात फक्त आर्थिक लाभ नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा महत्त्वाचा भाग आहे. काव्याची कथा आपणास शिकवते की, कठोर निर्णय आणि मेहनतीचा परिणाम लवकरच मोठ्या यशात बदलू शकतो.
आणखी वाचा
- उत्तम शेती करण्यासाठी कोणत्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.
- Agro Tourism – शेतकऱ्यांसाठी वरदान
- शेतकऱ्यांसाठी 20 लाख कोटी रुपयांचं कर्ज! KCC योजनेची माहिती जाणून घ्या
- कमी खर्चात लाखोंची कमाई, बेबी कॉर्न लागवड करा
- पंतप्रधान कुसुम सोलार योजनेबद्दल सर्वकाही
- शेतजमीन विकत घ्यायची आहे का? वाचा या 5 गोष्टी, नाहीतर पडाल नुकसानीत!
- Tomato Price : टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल! नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकार सज्ज



