सोलापूरच्या या माणसानं देशातील पहिली बोट, पहिली कार आणि पहिलं विमान बनवणारी कंपनी उभी केली – वालचंद हिराचंद

भारतातली पहिली शिपयार्ड कंपनी, पहिली विमान कंपनी सोलापुरात जन्मलेल्या एका महाराष्ट्रीयन माणसाने चालू केली असं सांगितलं तर ते अनेकांना विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. त्या माणसाचं नाव आहे वालचंद हिराचंद दोशी.
२३ नोव्हेंबर १८८२ रोजी हिराचंद दोशी व सौ. राजू दोशी यांच्या पोटी वालचंद यांचा जन्म सोलापूरमध्ये झाला. त्यांचे वडील सुती कपड्याचे व्यापारी होते. वालचंद यांचे वालचंदजी १८९९ मध्ये सोलापूरातून मॅट्रिक झाले आणि त्यांनी पुढील शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज व पुणे येथील डेक्कन कॉलेज येथून इतिहास व अर्थशास्त्र या विषयातून पूर्ण केले. त्यानंतर ते वडिलांच्या व्यवसायात आले. वडिलांसोबत कपड्याचा व्यापार करणाऱ्या वालचंद यांच्या लक्षात आलं की, आपलं काय या व्यवसायात मन रमत नाही. त्यांनी स्वत: बांधकाम कंत्राटदार होण्याचा निर्णय घेतला

तो काळ होता जेव्हा भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता आणि या ब्रिटिश भारतात गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी नुकतीच रेल्वेची सुरुवात होती, तर दुसरीकडे उद्योगपटलावर जमशेदजी टाटांसारख्या दिग्गजांचा जन्म होत होता.
या परिस्थितीत कौटुंबिक व्यवसायात न अडकता वालचंद यांनी रेल्वेमध्ये कारकून असलेले आपले सहकारी लक्ष्मण बळवंत पाठक यांच्यासोबत, पाठक वालचंद प्रायव्हेट लिमिटेड ही कन्स्ट्रक्शन कंपनी चालू केली. संपूर्ण भारतीय असणारी ही कंपनी त्यावेळची गरज होती. त्यामुळं खूप कमी वेळात कंपनीनं जोम धरला.
कामाचे तसेच कर्मचाऱ्यांचे योग्य व्यवस्थापन, कामे वेळेत पूर्ण करण्याची सचोटी आणि आर्थिक रक्कम उभी करण्याचे सामर्थ्य यामुळं वालचंद यांच्या कंपनीने अल्पावधीतच गोऱ्या सरकारचा विश्वास कमावला. यामुळं झालं असं की, बांधकामाचे मोठमोठे प्रकल्प वालचंद यांच्या कंपनीला मिळू लागले. ‘बार्शी लाईट’ हा सात किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग बांधण्याचं काम त्यांनी अतिशय कुशलतेने आणि वेळेत पूर्ण करून दिले. या त्यांच्या कामाकडे पाहून त्यांना बोरीबंदर ते चिंचपोकळी व पुढे करी रोड ते ठाणे आणि मग ठाणे ते कल्याण या रेल्वेमार्गांच्या चौपदरीकरणाचेही काम मिळाले. ते सुद्धा त्यांनी चोख व वेळेत पूर्ण केले. या त्यांच्या उत्तम आणि वेळेत काम करण्याच्या लौकिकामुळे त्यांना रेल्वेची, सार्वजनिक बांधकाम खात्याची, धरणांची, पुलांची तसेच मुंबई महानगरपालिका इमारत बांधणीची व इतर कामेही मिळाली. अशा प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे बांधकाम क्षेत्रात त्यांचा पूर्ण जम बसला.
काही कालवधीनंतर पाठक यांनी कंपनीतून आपली भागीदारी काढून घेतली. मात्र व्यवसायाची वाढती मागणी आणि आपल्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी १९२० मध्ये वालचंद यांनी आपली ही कंपनी टाटा समूहामध्ये विलीन केली.
वालचंद यांच्या कंपनीने टाटा समूहासोबत अनेक मोठे प्रकल्प पूर्ण केले. जसे की मुंबई पुण्याला जोडणारा बोर घाटातील रेल्वे बोगदा, तानसापासून मुंबईला पाणी मिळण्यासाठी टाकलेल्या गेलेल्या मोठ्या पाईपलाईन, याशिवाय सिंधू नदीवरील कलबाग पुल, सध्याच्या म्यानमारमधील इरावती नदीवरील पूल हे सुद्धा वालचंद त्यांच्याच नेतृत्वाखाली पूर्ण झाले. १९३५ मध्ये टाटांनी आपला समभाग विकला, यानंतर या कंपनीचं नाव हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी असं ठेवलं गेलं. वालचंद यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी चांगलीच नावारूपाला आली.
वालचंद यांनी 1908 मध्ये ‘वालचंदनगर इंडस्ट्रीजची’ स्थापना केली. जिथे साखर, साखर कारखाना मशिनरी, प्लास्टिकच्या वस्तू, सिमेंट प्लांट, पेपर, बॉयलर, टर्बाइन अशा अनेक वस्तू बनवल्या जातात.
1919 मध्ये पहिल्या महायुद्धानंतर जलवाहतुकीचं महत्त्व वाढू लागलं. ही संधी लक्षात घेऊन ग्वाल्हेरचे राज्यकर्ते शिंदे यांच्याकडून वालचंद यांनी एस एस लॉयल्टी ही बोट विकत घेतली आणि मालवाहतूक चालू केली. ब्रिटिशांच्या मक्तेदारीलाच आव्हान दिल्यामुळे त्यांच्यापुढे समस्यांचे अनेक डोंगर ब्रिटिश कंपन्यांनी उभे केले. त्यामुळे त्यांना खूप तोटा व त्रास सहन करावा लागला. वालचंद यांची ही कंपनी परदेशी कंपन्यांनासोबत दराबाबत चांगलीच स्पर्धा करत होती. सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन या नावाने चालू केलेली ही भारतातली पहिली जलवाहतूक कंपनी.

5 एप्रिल 1919 रोजी एस एस रॉयल्टी या बोटीने मुंबई ते लंडन हा पहिला प्रवास पूर्ण केला आणि म्हणूनच पाच एप्रिल हा दिवस नॅशनल मेरीटाईम डे म्हणजेच समुद्री दिन म्हणून साजरा केला जातो. १९५० पर्यंत वालचंद या कंपनीचे प्रमुख होते. तोपर्यंत किनारी भागात केल्या जाणाऱ्या वाहतुकीचा २१ टक्क्यांहून अधिक भाग वालचंद यांच्या कंपनीने काबीज केला होता. महात्मा गांधीनी स्वतः हरिजन आणि बहिष्कार या वृत्तपत्रांमधून पहिली स्वदेशी कंपनी असा या कंपनीचा उल्लेख केला होता.
पुढे 1940 मध्ये विशाखापट्टणम येथे त्यांनी सिंधिया शिपयार्ड ही जहाजबांधणी कंपनी सुरु केली. ही देखील पहिली स्वदेशी शिपयार्ड कंपनी ठरली. या कंपनीने जलसा ही पहिली स्वदेशी बोट बांधली. पुढे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर १९६१ साली याचे राष्ट्रीयीकरण होऊन ती हिंदुस्तान शिपयार्ड कंपनी म्हणून नावारूपाला आली.
1939 साली वालचंद यांची भेट अमेरिकेतील विमान उत्पादकांशी झाली. त्यांच्याकडून विमान निर्मितीचे कौशल्य शिकल्यानंतर म्हैसूर संस्थानच्या मदतीने त्यांनी बंगळूरु येथे पहिली विमान निर्माण करणारी कंपनी बनवली. १९४१ मध्ये सरकाराने त्याचा एक तृतीयांश भाग विकत घेतला. पुढे 1942 मध्ये दुसऱ्या महायुद्धाची लढाऊ विमानांची गरज पूर्ण करण्यासाठी सरकारने संपूर्ण कंपनी विकत घेतली आणि हिंदुस्थान एअरक्राफ्ट हे नाव बदलून त्याला हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड असं नाव दिलं. आजही तिथे जागतिक दर्जाची विमाने बनतात.

१९३०-४०च्या दशकात वाहननिर्मिती उद्योग आपला जम बसवत होता. वाहन क्षेत्रातली संधी ओळखत वालचंद यांनी क्रायस्लर कंपनीशी करार केला आणि ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये देखील ते उतरले. १९४५ मध्ये त्यांनी मुंबईजवळ ‘प्रिमिअर ऑटोमोबाईल्स’ ही कंपनी स्थापन केली. मोटारीचे सुटे भाग बनवण्यापासून सुरू झालेल्या या कंपनीने पुढे फियाट या परदेशी कंपनीच्या सहकार्याने देशामध्ये पुढे बरीच वर्षे मोटारींचा पुरवठा केला. आज अजूनही त्यातील काही मोटारी भारताच्या रस्त्यांवर धावत आहेत.

आपल्या सर्वांचं लहानपण ज्या रावळगाव चॉकलेटने गोड केलं, ते चॉकलेटसुद्धा वालचंद यांचीच देण. १९३३ मध्ये त्यांनी रावळगाव येथे शुगर फॉर्म चालू केलं, तिथंच हे चॉकलेट बनवलं जात होत. सातारा इथलं कूपर इंजिनिअरिंग, कळंब साखर कारखाना यांसारखे अनेक उद्योग वालचंद हिराचंद दोषी यांच्या उद्योगसमूहाने यशस्वी केले.

ब्रिटिशांचा साम्राज्याखाली असणाऱ्या भारताची आर्थिक गुलामगिरीतून मुक्तता होण्यासाठी त्यांनी हरतऱ्हेने मदत केली. उद्योगासोबतच त्यांनी अनेक सामाजिक कामं देखील केली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा वालचंद उद्योगसमूह हा देशातील पहिल्या दहा मोठ्या उद्योगांपैकी एक होता. १९४९ मध्ये, त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि १९५० मध्ये व्यवसायातून निवृत्त झाले. ८ एप्रिल १९५३ मध्ये उद्योग क्षेत्रातील या अवलियाने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू लालचंद यांनी त्यांचा व्यवसाय सांभाळला.
शेठजी अतिशय गुणग्राहक होते, कट्टर राष्ट्रनिष्ठ होते. सचोटी, दर्जा, प्रामाणिकपणा यांमध्ये तडजोड कधीही न केल्याने त्यांना नेहमीच लोकांचा पाठिंबा मिळाला. आपल्या गतिमान व सर्जनशील बुद्धिमत्तेच्या व कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी भारतात एका नव्या औद्योगिक युगाचा प्रारंभ केला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली.
वालचंद शेठजींचं कार्य आणि त्यांचा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील सिंहाचा वाटा नेहमीच आपल्या स्मरणात राहील. खऱ्या अर्थाने वालचंद हिराचंद दोशी यांनी मेक इन इंडिया मॉडेल साकारले असे म्हणायला हरकत नाही.
तर ही होती आधुनिक भारताच्या औद्योगिकीकरणाचे शिल्पकार वालचंद हिराचंद दोशी यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
आणखी वाचा
- जगातील सर्वात मोठ्या बँकेचे संस्थापक जे पी मोर्गन यांची कहाणी
- या माणसामुळे आपल्या घरापर्यंत वीज पोहचली- निकोला टेस्ला
- फोटोग्राफी क्षेत्रातला पहिला कॅमेरा बनवणारा अवलिया – जॉर्ज इस्टमन
- जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ
- यांच्यामुळे सामान्य माणसाच्या दारात गाडी उभी राहिले – हेन्री फोर्ड
- सायकलच्या दुकानापासून १० हजार कोटींपर्यंत पहिले मराठी उद्योगपती – लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर
- मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, तोच मुलगा जगातील सर्वात मोठा संशोधक बनला
- इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या
- अवघ्या भारताच भविष्य बदलणाऱ्या टाटा कंपनीची सुरुवात कशी झाली?