भारतातील ‘हे’ राज्य आहे पूर्णपणे Tax Free! कारण माहितीय का?


मार्च महिना आला की सगळ्यांची एकच धाकधूक असते ITR (Income Tax Return) कसा भरायचा? आणि टॅक्स कसा वाचवायचा? पण मित्रांनो तुम्हाला माहिते का? आपल्या भारतातच एक असं राज्य आहे, जिथे लोकांना इन्कम टॅक्स काय असतो हेच माहीत नाही… होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. तुम्ही वर्षाला ५ लाख कमवा किंवा ५० लाख, सरकारला एक रुपयाही टॅक्स द्यावा लागत नाही. हे राज्य आहे सिक्कीम!
आता तुम्ही म्हणाल, असं कसं काय शक्य आहे? आपण तर चहाच्या कपापासून पेट्रोलपर्यंत सगळीकडे टॅक्स (Tax) भरतोय. मग सिक्कीममध्ये टॅक्स का नाही? तर यामागे एक ऐतिहासिक कारण आहे. १९७५ मध्ये जेव्हा सिक्कीम भारताचा २२ वा भाग बनला, तेव्हा एका करारा अंतर्गत भारतीय संविधानात कलम ३७१ (F) जोडण्यात आले. या विशेष कायद्यानुसार, सिक्कीमच्या मूळ रहिवाशांना भारताचा ‘इन्कम टॅक्स ॲक्ट १९६१’ लागू होत नाही. म्हणजेच, त्यांची १००% कमाई थेट त्यांच्याच बँक खात्यात राहते.
पण इथे एक ट्विस्ट आहे, ही करसवलत फक्त आणि फक्त सिक्कीमच्या मूळ रहिवाशांनाच लागू होते. म्हणजेच जे १९७५ पूर्वीपासून सिक्कीममध्ये स्थायिक आहेत आणि ज्यांच्याकडे सिक्कीम सब्जेक्ट सर्टिफिकेट आहे अशांनाच या करसवलतीचा फायदा घेता येतो. जर तुम्ही महाराष्ट्रातून किंवा इतर राज्यातून तिथे जाऊन व्यापार किंवा नोकरी करत असाल, तर तुम्हाला मात्र नियमानुसार टॅक्स भरावाच लागेल.
तसेच, ही सवलत फक्त तिथल्या स्थानिक उत्पन्नावर आणि शेअर्स किंवा सुरक्षित गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्यावर मिळते. निसर्गाचा अनमोल ठेवा, प्रदूषणमुक्त वातावरण, १००% सेंद्रिय शेती आणि वरून पैशांची होणारी ही मोठी बचत… यामुळेच सिक्कीम हे खऱ्या अर्थाने भारताचे ‘टॅक्स फ्री हेवन’ मानले जाते.



