इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट २०२६: जागतिक एआय (AI) क्रांतीचे केंद्र म्हणून भारताचा उदय

मानवी संस्कृतीच्या वाटचालीत तंत्रज्ञान जेव्हा केवळ प्रगतीचे साधन न राहता सामाजिक परिवर्तनाचा कणा बनते, तेव्हा खऱ्या अर्थाने नव्या युगाची सुरुवात होते. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे १६ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली ‘इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट’ हा असाच एक ऐतिहासिक टप्पा ठरत आहे. ‘ग्लोबल साऊथ’ (जागतिक दक्षिण) मधील देशांनी आयोजित केलेली ही पहिलीच मोठी जागतिक शिखर परिषद असून, तिने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या समिटने केवळ तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेवर चर्चा न करता, त्याच्या प्रत्यक्ष ‘प्रभावावर’ (Impact) लक्ष केंद्रित करून भारताला एआय क्षेत्रातील जागतिक धोरणकर्ता म्हणून प्रस्थापित केले आहे.
‘मानव’ (MANAV) व्हिजन: एआय(AI) चे मानवीकरण
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय (AI) तंत्रज्ञानाला मशीन-केंद्रित चौकटीतून बाहेर काढून ‘मानव-केंद्रित’ बनवण्यासाठी ‘MANAV’ (मानव) हे पाच कलमी सूत्र जगासमोर मांडले:
१. M (Moral – नैतिक): एआय (AI) प्रणाली पूर्णपणे नैतिक आणि मानवी मूल्यांच्या चौकटीत असणे आवश्यक आहे.
२. A (Accountable – उत्तरदायी): तंत्रज्ञानाचा वापर करताना त्याचे प्रशासन पारदर्शक आणि उत्तरदायी असले पाहिजे.
३. N (National Sovereignty राष्ट्रीय सार्वभौमत्व): प्रत्येक देशाचा आणि नागरिकाचा त्यांच्या स्वतःच्या डेटावर अधिकार असावा, ज्यामुळे ‘डिजिटल वसाहतवाद’ टाळता येईल.
४. A (Accessible – सुलभता): एआय (AI) वर काही मोजक्या कॉर्पोरेट संस्थांची मक्तेदारी नसावी; ते समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे.
५. V (Valid – वैधता): एआय मॉडेल्स (AI Models) हे कायदेशीररित्या वैध, विश्वसनीय आणि पडताळणीयोग्य असावेत.
पंतप्रधानांनी एआय (AI)ची तुलना ‘जीपीएस’ (GPS) शी केली; ज्याप्रमाणे जीपीएस रस्ता दाखवते, पण जाण्याची दिशा चालक ठरवतो, तसेच एआय (AI) चे नियंत्रण नेहमी मानवाच्या हातात राहिले पाहिजे. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ (सर्वांचे कल्याण आणि सर्वांचा आनंद) हाच भारतासाठी एआय (AI) च्या प्रगतीचा बेंचमार्क असेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
जागतिक दिग्गजांचा भारतावर विश्वास
या परिषदेत जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुखांनी उपस्थित राहून भारताच्या वाढत्या तांत्रिक सामर्थ्याचे कौतुक केले:
सुंदर पिचाई (Google): पिचाई यांनी ‘इंडिया-अमेरिका कनेक्ट’ या नवीन उपक्रमाची घोषणा केली, ज्यांतर्गत भारत, अमेरिका आणि दक्षिण गोलार्धातील देशांना जोडण्यासाठी नवीन सब-सी (समुद्राखालून) केबल मार्ग तयार केले जातील. यामुळे एआय (AI) डेटा ट्रान्सफरची गती प्रचंड वाढेल. तसेच, भारतीयांच्या कौशल्य विकासासाठी ‘Google AI Professional Certificate’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमही त्यांनी लाँच केला.
सॅम ऑल्टमन (OpenAI): ऑल्टमन यांनी नमूद केले की, भारताकडे ‘फुल-स्टॅक एआय (AI) लीडर’ बनण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिभा, धोरणे आणि उत्साह आहे. ओपन-एआय (OpenAI) भारतात आपली व्याप्ती वाढवण्यासाठी भारत सरकारसोबत नवीन भागीदारी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
इमॅन्युएल मॅक्रॉन (फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष): मॅक्रॉन यांनी भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचे (UPI, आधार) कौतुक केले आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी सोशल मीडियावर कडक निर्बंध लादण्याचे आवाहन केले.
एन. चंद्रशेखरन (टाटा सन्स): चंद्रशेखरन यांनी एआय (AI) ची तुलना वाफेचे इंजिन, वीज आणि इंटरनेटशी केली. आयटी उद्योगासाठी एआय (AI) हा अडथळा नसून सर्वात मोठी संधी असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
नंदन निलेकणी (Infosys): निलेकणी यांनी डिप्लॉयमेंट गॅप (Deployment Gap) ही मुख्य अडचण असल्याचे सांगितले. एआय (AI)चा वापर करून जुन्या प्रणालींचे आधुनिकीकरण (Modernization) करणे आता आर्थिकदृष्ट्या अधिक सुलभ झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.
तात्विक पाया: तीन सूत्रे आणि सात चक्रं
तीन सूत्रे
या शिखर परिषदेची संपूर्ण रचना भारताच्या प्राचीन ज्ञानाला आधुनिक विज्ञानाशी जोडणाऱ्या संकल्पनांवर आधारित आहे. ही परिषद लोक (People), ग्रह (Planet) आणि प्रगती (Progress) या तीन मूलभूत सूत्रांवर उभी आहे.
या सूत्रांच्या अंमलबजावणीसाठी सात तांत्रिक चक्रं:
सुरक्षित आणि विश्वासार्ह एआय (AI):
एआय (AI) सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह असावा यासाठी मजबूत नियम आणि तंत्रज्ञान आवश्यक आहे, जे सर्व देशांना एआय (AI) नियंत्रणात सहभागी होण्यास मदत करतील.
ह्युमन कॅपिटल (मानव भांडवल):
एआय (AI) मुळे नोकऱ्या आणि कौशल्ये बदलत आहेत, म्हणून लोकांना नवीन कौशल्ये शिकवून रोजगार संधी समानपणे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
विज्ञान:
एआय (AI) विज्ञान संशोधनात मोठी मदत करत आहे आणि त्याचा वापर करून जागतिक स्तरावर सहकार्य व पारदर्शक संशोधनाला चालना देणे हे उद्दिष्ट आहे.
अनुकूलता, नवीन कल्पकता आणि कार्यक्षमता:
एआय (AI) मुळे ऊर्जा आणि पर्यावरणावर परिणाम होतो, म्हणून कमी संसाधनात कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक एआय (AI) प्रणाली विकसित करणे महत्त्वाचे आहे.
सामाजिक सक्षमीकरणासाठी समावेश:
एआय (AI) सर्व लोकांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करावा, जेणेकरून सर्व समाजघटकांना त्याचा फायदा मिळेल.
एआय (AI) संसाधनांचे लोकशाहीकरण:
एआयसाठी आवश्यक संगणकीय आणि डेटा संसाधने सर्व देशांना परवडणारी आणि उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे.
आर्थिक प्रगती आणि सामाजिक कल्याण:
एआय (AI) चा वापर करून अर्थव्यवस्था वाढवणे आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सेवा आणि नवोन्मेषाला चालना देणे महत्त्वाचे आहे.
स्वदेशी एआय: ‘भारतजेन’ आणि सार्वभौम मॉडेल्स
इंडिया-एआय मिशन (India AI mission) अंतर्गत भारत स्वतःचे Sovereign AI (सार्वभौम एआय) विकसित करण्यावर भर देत आहे.
भारतजेन (BharatGen): हा जगातील पहिला सरकारी अर्थसहाय्यित बहुभाषिक एआय (AI) उपक्रम आहे, जो भारताच्या सर्व २२ भाषांना सपोर्ट करतो. हे मॉडेल केवळ भाषांतर करत नाहीत, तर भारतीय संस्कृती आणि स्थानिक संदर्भांचा विचार करून उत्तरे देतात.
सर्वम एआय (Sarvam AI): या स्टार्टअपचे ‘Sarvam-1’ आणि ‘Bulbul V3’ सारखी मॉडेल्स भारतीय भाषांमधील टेक्स्ट-टू-स्पीच आणि व्हिजन प्रणालीमध्ये क्रांती घडवून आणत आहेत.
सामाजिक परिणाम आणि जागतिक आव्हाने
परिषदेचा मुख्य भर एआय (AI) ला सर्वसामान्यांच्या जीवनात आणण्यावर होता. ‘एआय फॉर ऑल’ (AI for ALL), ‘एआय बाय हर’ (AI by HER), आणि ‘युवा-एआय’ (YUVAi) या तीन प्रमुख जागतिक आव्हानांद्वारे (Challenges) सामाजिक परिणाम घडवणाऱ्या स्टार्टअप्स (Startups)ना गौरवण्यात आले. आरोग्य, कृषी, हवामान बदल आणि समावेशकता या क्षेत्रातील १० विजेत्यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात नेटवर्क-आधारित ओळख शोधण्याचे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले, जे नागरिकांना ऑनलाइन फसवणूक आणि ‘डिजिटल अरेस्ट’ सारख्या गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी गेम-चेंजर ठरेल.
‘इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ ही केवळ एक तांत्रिक परिषद नाही, तर ती भारताच्या तांत्रिक आत्मविश्वासाचा आविष्कार आहे. या परिषदेने सिद्ध केले की भारत आता केवळ तंत्रज्ञानाचा वापरकर्ता राहिलेला नाही, तर तो जगाला दिशा देणारा निर्माता बनला आहे. सुरक्षित, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक एआयच्या माध्यमातून भारत केवळ स्वतःचाच नव्हे, तर संपूर्ण जागतिक दक्षिणचा विकास सुनिश्चित करत आहे. ही परिषद ‘विकसित भारत @ २०४७’ या स्वप्नाच्या दिशेने टाकलेले एक निर्णायक पाऊल आहे.




